नवी दिल्ली : राम मंदिरांच्या उद्घाटनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिर ट्रस्ट कडून देशातील मान्यवर राजकीय लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण महाराष्ट्रातील नेत्यांना मात्र अद्याप अशा स्वरुपाची निमंत्रण पाठवण्यात आलेली नाहीत.
शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचं बोललं जात आहेत. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील उद्याप निमंत्रण आलं नसल्याचं समोर आलं आहे. पण पवारांनी राम मंदिरावरुन सध्या भाजपचं राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.भाजपकडून राजकारण
शरद पवारांनी गुरुवारी माध्यमांशी बोलाताना म्हटलं की, मला अद्याप राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं नाही. भाजप सध्या राम मंदिराच्या नावानं राजकारण करत आहे. जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षाकडं सध्या कुठलाही ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळं ते राम मंदिरावरुन जनतेमध्ये वेगळा मतप्रवाह तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
ठाकरे बंधुंनाही निमंत्रण नाही
दरम्यान, महाराष्ट्रात कायम हिंदुत्वाच्या राजकारणात आघाडीवर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यात आत शरद पवारांनीही निमंत्रण न मिळाल्याचं सांगितल्यानं महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना जाणीवपूर्वक या सोहळ्यापासून डावलण्यात आलं आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.
पण या निमंत्रणाच्या वादावर राम जन्मभूमी ट्रस्टनं किंवा सत्ताधारी भाजपन कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळं या विषयावरुन राजकारण होतंय अशी सध्या चर्चा सुरु आहे.