पुणे : आंबेगावच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मल्चिंग पेपरवर उन्हाळी कांदा लागवड केली आहे.
जारकवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी नवनाथ भोजणे, संदीप लोले, माऊली धानापुणे यांसह काही शेतकऱ्यांनी पाच एकरांवर प्रयोग केला आहे.
पूर्व आंबेगावात सध्या उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. शेतकरी सतत शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. पारंपरिक पद्धतीने पाटपाण्यावरील लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाच्या आधारे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतो.
तालुक्यातील अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन या तंत्राआधारे कांद्याची आधुनिक शेती करू लागले आहेत.
भारनियमन आणि बिबट्यांपासून बचाव पाटपाण्यावर कांदा उत्पादन घेताना थंडीत रात्री अपरात्री पिकाला पाणी द्यावे लागत होते. पूर्व आंबेगाव हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी जायला भीती वाटायची.
बिबट्यांचे हल्ले आणि प्रसंगी शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावरील पद्धतीमुळे पाणी देण्याच्या वेळा व वापर पद्धतीत बदल झाला. कष्ट कमी झाले. भारनियमन आणि बिबट्याची भीती कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव शेतकरी व्यक्त करीत आहे.
मल्चिंग पेपरवरील कांदा लागवडीचे फायदे
– मल्चिंग पेपरवर एकसारख्या अंतरावरील छिद्रांमुळे दोन रोपांमधील अंतर एकसारखे राहाते. परिणामी कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. प्रति कांद्याचे साधारण वजन चांगल्या ग्रॅमपर्यंत मिळते.
– रंग आणि आकार एकसारखा राहिल्याने बाजारात चांगले दर मिळण्यास मदत होते.
– तणांची वाढनियंत्रणात ठेवण्यात येते. खुरपणी खर्च व तणनाशकांच्या फवारणीत बचत होते.
– टिकवण क्षमतेत चांगली वाढ. त्यामुळे बाजारपेठेच्या अंदाजानुसार विक्री नियोजनाला संधी मिळते.
– पारंपरिक पद्धतीमध्ये पाटपाण्यावर कांदा लागवडीसाठी वाफ्यांमध्ये पाणी साठवावे लागत असे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत होता. आता ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत होणार आहे.